घराचं घरपण

'ही काय कटकट आहे,' असं मनातल्या मनात चरफडतच मी मोबाईलमधून वाजणारा अलार्म कोणतंतरी बटण दाबून बंद केला.एव्हाना डोळ्यावर सूर्याची कोवळी किरणही 'ठकठक' करायला लागली होती. मी डोळ्याचा पडदा थोडासा 'मायक्रोमीटर' उघडून इथे तिथे पाहिलं. मी आमच्या गावातल्या घरात होतो आणि ते जाणवल्यावर मी जरा जास्तच 'रिलॅक्स' झालो. वर तो थोडासा जुना झालेला पंखा एक विशिष्ट आवाज काढत आपल्याच लयीत फिरत होता. भिंतीवर सूर्यकिरणांनी मस्त नक्षीदार रांगोळी काढली होती. देवघरातील अगरबत्ती, बाहेर पेटत असलेल्या चुलीतील धूर, त्यावर तयार होत असलेली भाकरी, कोणततरी फुललेलं फूल आणि दुसरेही कसलेतरी पण छानच वाटणारे वेगवेगळे वास 'हर हर महादेव' करत वेगवेगळी आवर्तन घेत माझ्या नाकाच्या गुहेत शिरकाव करत होते. कसल्याश्या पक्षांचा हलकासा किलबिलाट चालू होता. जणू ते माझ्यासाठी 'उठी उठी गोपाळा'चे रागच आळवत होते. सगळं कसं मस्तच वाटत होतं,पण तितक्यात मोबाईल परत बोंबलायला लागला. ह्यावेळी मी डोळे थोडेसे जास्त 'मायक्रोमीटरने' उघडले. वर नजर गेली तर तो आमच्या कॉलनीतल्या घरातला मॅड पंखाच स्वत:भोवती गिरक्या घेत घेत माझ्याकडे बघून हसत होता. मी लागलीच मोबाईल हातात घेतला तेव्हा लक्षात आलं केव्हापासून 'स्नूझ' करत करत आता ऑफिसची बस यायला केवळ १५ मिनटे राहिली होती. क्षणार्धात अवघ जगच पालटलं होत. मी मनाच्या इच्छेविरूद्ध त्याच्याशी जोरदार लढा देत कसाबसा अंथरुणावरून उठलो आणि झटपट पुढच्या तयारीला लागलो.

मित्रांनो, तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का की कोणत्यातरी क्षणी तुम्हाला राहत्या घरात असतांना गावातल्या घरात वगैरे असल्याचं जाणवतं. बघा आठवून. कारण माझ्याबरोबर असं एकदा नाही तर चांगलं तीन-चार वेळा झालेलं आहे . नाही, माझा ऋषी कपूरच्या 'कर्ज ' सिनेमासारखा काही 'सीन' नाहीये कारण हे घर माझ्यासमोरच बांधलं गेलं आहे त्यामुळे पूर्वजन्मात वगैरे तिथे राहिल्याचा प्रश्न येत नाही. तसं आम्ही लहान असतांना हे घर बांधलं गेलं आहे.लहानपणी मे महिन्याची सुट्टी पडली रे पडली की आम्ही 'डायरेक्ट' गावी न जाता आधी मुंबईला (जोगेश्वरी) रहाणार्‍या आत्याकडे जायचो आणि तिथे चांगली आठ-दहा दिवस धमाल करून मग आत्याच्या मुलांसह गावी परतायचो. पण ज्या वर्षी हे घर बांधलं गेलं होतं, त्या वर्षी फक्त दोनच दिवसात मी रडून गावी परतलो होतो आणि परतायचं कारण काय होतं सांगू? - 'गावातल्या नवीन घराची आठवण'! आताही आम्ही सगळे एकत्र आलो आणि कधी ही माझ्या घराच्या आठवणीची आठवण निघाली कि चांगलीच खसखस पिकते. तर तेव्हा नक्की माझं भावविश्व काय होत ते अचूकपणे सांगता येत नाही पण असा मी अगदी लहानपणापासून घराशी वेगळ्याच धाग्याने जोडला गेलो आहे.

कसंही का असेना पण आपल्या घरात आपल्याला जेवढी सुरक्षितता वाटते, तेवढी कुठेच वाटत नाही. मी कुठेही बाहेर गेल्यावर परततांना कितीही उशीर झाला, रात्रीच्या प्रवासाची रिस्क घ्यावी लागली, झोप कमी घ्यावी लागली तरी बहुतांशी कसंपण घरी येऊनच अंग टाकतो. सकाळी डोळे उघडल्यावर आपल्या घरात असल्याचा 'फील' वेगळाच असतो. कोणाला पापी पोटासाठी नोकरी करतांना दर काही वर्षांनी घर बदलावं लागतं. एका घराशी नातं जोडायचं आणि काही वर्षातच त्याचा निरोप घ्यायचा. अश्या लोकांबद्दल मला खरंच सहानुभूती वाटते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस साधारणत: अवघ्या आयुष्याची पुंजी ह्या घरासाठीच रिकामी करत असतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांचंच घराशी एक वेगळच नातं निर्माण झालेलं असतं. ते घर आपल्या सुखदु:खाचं, अनेक छोट्यामोठ्या घटनांचं मूक साक्षीदार असतं. कोणी ह्याच घरात मरणाच्या दारातून परत आलेल असतं, कोणाला नोकरीचा कॉल ह्याच घरात आलेला असतो, कोणाचं लग्न ह्याच घरात ठरलेलं असतं, त्याच्याबरोबर/तिच्याबरोबर गप्पा मारत कधी अख्खी रात्र जागवलेली असते, ती ह्याच घरात. चिंटूचा जन्म झाला तो ह्याच घरात, कोणाच्या पूर्वजांच्या अनेक आठवणी विखुरलेल्या असतात त्या ह्याच घरात... अश्या वेगवेगळया बंधानी लोक ह्या घराशी जोडले गेलेले असतात .

असाच एकदा मी आमच्या घरी गेलो.तिथे पोहोचल्यावर मी फाटकरावांना हळूच धक्का दिला कारण बऱ्याचदा त्यांना प्रेमाची भाषा कळत नाही. पण असा थोडासा हिसका दाखवला कि रावांचं डोक थोडं ठिकाणावर येतं. ते रागाने गुरगुरत कुरकुर करत उघडले गेले पण उघडता उघडता ओळख पटल्याने एक डोळा मिचकावून त्याने माझे लगेच स्वागतही केले. मी बाजूला नजर टाकली. कुंपणही माझ्याकडे बघून एक मंद स्मिहास्य देत होतं. मी त्या स्मितहास्याचा स्वीकार करून पुढे गेलो. अंगणात चालता चालता एका ठिकाणी थोड ओ होतं, तिथे माझा पाय सरकत होता पण मी थोडक्यात सावरलं आणि म्हटलं बराच 'स्लीपरी' झालाय हा भाग. त्यावर अंगण लगेचच ओरडलं, "जरा डोळे उघडे ठेऊन नीट चालता येत नाही तुला आणि मला बोलतोय. हे पाणी पण सकाळी तूच इथे टाकलंस ना? वा रे! तुम्हाला नाचता येत नाही आणि आम्ही वाकडे. सहीये!" मी कानावर हात ठेवतच झटपट पायऱ्या ओलांडून दरवाजेबुवांकडे कूच केलं. दरवाजेबुवा हाताची घडी घालून मस्त उभे होते. ते रामसेंच्या चित्रपटात ह्यांचे कोण ते चुलत भाऊ आहेत ना, ते खूप मोठ्या आवजात कुरकुरत असतात पण आमचे हे बुवा मात्र अगदी शांत कधी उघडले कधी बंद झाले कळतही नाही. पण ते रामसेवाले त्याचे चुलत भाऊ आपोआप उघडतात, ह्यांना मात्र आमचा हाताचा प्रेमळ स्पर्श हवा असतो. दरवाजेबुवांना गोंजारत मी घरात प्रवेश केला. आत दोन खुर्च्या मी त्यांच्या मांडीवर बसावं म्हणून आपापसात भांडत होत्या मी त्यांना ठेंगा दाखवत मऊ गादीवाल्या सोफाभाऊच्या कुशीत हळूच विसावलो.

तिथे बसतो न बसतो तोच चांगलाच गलबलाट ऐकू यायला लागला.सगळ्या भिंती ताई आपापसात गप्पा मारत होत्या.माझ्या आगमनामुळे कदाचित त्यांच्या गप्पात खंड पडला होता पण आता त्यांच्या गप्पा पूर्ववत झाल्या होत्या. एक भिंत म्हणत होती, "खूप बोअर झालंय, अगं ए खिडके, केव्हापासून बाहेर काय बघत बसलीयेस? आम्हाला पण सांग ना काय बघतेस ते." खिडकीने काहीच उत्तर दिल नाही. ती आपल्याच तंद्रीत होती. असं तासन्‌तास बाहेर बघायचं हाच तिचा छंद होता. ती कधीतरीच ह्यांच्या संभाषणात सहभागी व्हायची. मग मधली भिंत म्हणाली, "अग बाहेर ना एक फूल मस्त फुललं आहे. केव्हापासून एक भुंगा येऊन त्या फुलाच्या कानात गाणी म्हणतोय आणि त्यावर ते फूलल खुश होऊन हसतंय आणि त्या भुंग्याला काहीतरी भेट देतेय. मग भुंगेबुवा त्याचा निरोप घेतात पण न राहावल्याने त्या फुलाकडे परत परत येत आहेत. मध्येच एखाद रंगीबेरंगी फुलपाखरुही त्या फुलाबरोबर खेळायला येतंय. सुंदरच चालू आहे ग सगळं आणि ही बया त्यांच्याच विश्वात रमली आहे. ती कसलं तुला उत्तर देतेय." ह्यावर ती बाहेरची भिंत बोलली, "बघ ना, मी माझ्या हृदयात हिला जागा दिली आहे आणि ही अशी मला काही बाहेरील गमती सांगतच नाही. तुझं बरं आहे गं! तुला बाहेरच सगळं दिसतेही आणि तुझ्या पाठीला मला सहन करावा लागणारे उन्हाचे चटके, वाऱ्यापावसाचा मारही बसत नाही. माझं मेलीचं नशीबच फुटकं."

ह्यावर वरचे छप्परभाऊ म्हणाले तुला तर काही वेळ ते उन्हाचे चटके वैगेरे सहन करावे लागतात मला तर सबंध दिवस ते सगळं सहन करावं लागतं आणि तुम्ही स्वत:च्या पायावर उभ्या आहात मला हे असं तुमच्या कुबड्या घेऊन..." छप्परभाऊंच बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच समोरचे भिंत कडाडली, "एऽ, जा गं... तुला माझ्याकडे पाठ करून ठेवलेला टीवी बघतांना कसली मजा येते. तेव्हा खिदळता काय, ते खोट दु:ख पाहून रडता काय... ह्या माणसांना वाटत असेल तुझ्या चेहऱ्यावर अजून जो ओलावा आहे तो पावसाच्या पाण्यामुळे असेल पण मला माहितेय; काल ती सासूसुनेवरची कोणती मालिका चालू होती, ती बघून मुसमुसून रडत असतांना तो ओलावा आलाय." तेवढ्यात समोरची दुसरी भिंत किंचाळली, "जा गं, तुम्ही सगळ्या माझे काय हाल होतात तुम्हाला काय सांगू? ह्या घरात कोणाचा वाढदिवस असो किंवा गणपती बाप्पांसारखा उत्सव असो; हे लोक माझ्या अंगावर त्या चिकट गमने किंवा सेलोटेपने काय काय चिकटवत असतात. वर ती कसली लायटिंग सोडतात तिचा पण शॉक लागतो माहितीये मला कितीतरी वेळा , अजून काही लावायला हे लोक खिळे काय ठोकतात माझ्या अंगावर, मी तेव्हा आतून खूप हादरते पण करणार काय? वर ते सगळ डेकोरेशन काढतांना कसलं ओरबाडून काढतात. माझ्या उजव्या हाताची तर चामडीच सोलली होती ह्यावर्षीच गणपतीचं डेकोरेशन काढतांना. हे बघा, खरचटल्याची खूण दिसते आहे. तुम्ही आपलं तेव्हा बोलता, "कसली नटलीये बघा," पण माझं मलाच माहिती गं बाई!"

एवढ्यात आतल्या बेडरूमची भिंत मधून म्हणाली, "काय रडत बसल्यात तुम्ही नुसत्या... त्या तिथं शहरात बघा, आपल्या सारख्या भिंतीना ही माणसं दहीहंडीला कशी एकावर एक थर करून उभी असतात, तसं एकमेकींच्या खांद्यावर एकमेकांच ओझं घेऊन उभ राहायला लागतं ...बिल्डिंग का काय असं म्हणतात त्याला." बाहेरची एक भिंत म्हणाली, "अग बाई! खरंच का?...आणि तुला कोणी गं सांगितलं हे?" आतून परत आवाज आला, "अगं, तिकडे माझी मामेबहिण आहे ना पंधराव्या थरावर, तिनेच मला वार्‍याभाऊकडून त्यादिवशी 'मेसेज' पाठवला होता. बरं, ते जाऊ दे. मी आता तुम्हाला की नाई एक गंमत सांगते. आता लवकरच दिवाळी येत आहे आणि मी कालच त्या माणसांचं बोलणं ऐकलं. ते की नाई आपल्या सगळ्यांना नव्या रंगाचे कपडे घालणार आहेत आणि त्या छपर भाऊला सांगा, त्याला ना ते काहीतरी 'पीओपीचा' ड्रेस आणणार आहेत म्हणून .."

मग काय सगळ्या भिंतींचा एकच गलबलाट सुरु झाला.त्याक्षणी मला वाटलं कोण म्हणतं भिंतीना कान असतात? भिंतीना फक्त एकच अवयव असतो - तोंड! असो. त्यांचा किलबिलाट काही लवकर बंद होणार नव्हता, तेव्हा मी घराच्या मागे गेलो. त्यांच्या किलबिलाटात एका भिंतीचं बोलण मात्र मला आवडलं ती म्हणत होती, "आपल्या सर्वांमुळे हे घर उभं असलं तरी खऱ्या अर्थानं ते जिवंत असतं, ते त्या ह्या घरात राहणाऱ्या माणसांच्याच अस्तित्वानं आणि आता दिवाळीला तर हे सगळे इथे एकत्र येणार... सगळं कसं भरभरून जाणार..एकदम धमाल.. दिवस कसे सरतील ते कळणारही नाही ...ही दिवाळी वर्षातून दोनदा का गं येत नाही?"

घराच्या मागे गेल्या गेल्या तिथली पायरी बोलली, "ये, बैस माझ्या मांडीवर. मी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. आजवर कितीतरी कातरवेळा तू माझ्यासोबत घालवल्या आहेस. तुला जरा दु:ख झालं, जरा काही तुझ्या मनाला लागलं की तू इथे यायचास. हुंदके देत माझ्याशी ते 'शेअर' करायचास. तू दु:खी झाल्यावरच माझ्याकडे येत असल्याने तुझी नेहमीच आठवण येत असूनही, तुला माझ्याकडे यायला लागू नये असंच मी देवाला म्हणायचे. बरं, तुला आठवतं, तू सर्वप्रथम माझ्याकडे कधी आला होतास ते..." मला बरेचसे क्षण आठवून गहिवरल्यासारखं झालं होतं. त्या पायरीची पहिली भेटही आवडली, मी तिला त्याबद्दल सांगणार इतक्यात ..... मोबाईलचा अलार्म जोरजोरात वाजायला लागला.
--
देवेंद्र चुरी (दवबिंदू)
bcoolnjoy@gmail.com

15 comments:

क्रांति October 20, 2011 9:00 PM  

किती छान कल्पना आहे ही! घरातल्या निर्जीव घटकांनाही आपल्यासारखंच घराबद्दल काही वाटत असेल, ते बोलायला लागले तर काय बोलतील, ही आयडियाची कल्पना भारी आवडली. आणि लिखाणही तसंच सही झालंय.

davbindu October 21, 2011 1:20 AM  

घरात बसलेलो असतांना त्या घरानेच सांगितली ही आयडीयाची कल्पना ...आभार ग ... :)

सुहास October 21, 2011 1:40 PM  

मस्त रे... असे खूपवेळा घडलंय माझ्यासोबत... मी माझ्या गावी फेरफटका मारून आलोय. तिथल्या सर्वांशी असलेली भावनिक ओढ नेहमीच जाणवत राहते. आपल्या शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात अश्या विसाव्याची गरज प्रत्येकाला असते... मस्त लेख रे दवा :) :)

अपर्णा October 21, 2011 10:00 PM  

मस्त..मी ओरेगावला मूव झाले तेव्हा सुरुवातीला फिलीच घर सकाळी सकाळी माझ्या आठवणीत यायचं अजूनही येत...तिथून निघताना घर रिकामी झाल्यावर तिथल्या प्रत्येक खोलीत बसून असंच काहीस बोललेही होते...असो माझ्यासाठी हे सगळं उगीच सेंटी होतंय .....

onkardanke October 22, 2011 1:06 AM  

या लेखाची सुरुवात भन्नाट झाली आहे.माझ्या बाबतीत असे अनेकदा घडले आहे. मी गेल्या दहा वर्षांपासून घराबाहेर आहे. मात्र मन सतत लातूरच्या घराभोवती पिंगा घालत असते. लातूरला घरी असताना एक प्रकारच्या सुरक्षित कवचामध्ये आपण असल्याची भावना माझ्या मनामध्ये असते.

davbindu October 22, 2011 6:12 AM  

हो रे सुहास,थोडीशी रुखरुख मनात राहत असली तरी ते क्षण निश्चितच मनाला चांगला विसावा देतात...आभार मित्रा ..

davbindu October 22, 2011 6:15 AM  

सेंटी व्हायला होणारच ग अपर्णा,माणसांशी जसे ऋणानुबंध जुळतात तसे घराशीही जुळत असतातच..एक वेगळीच ओढ असते ग घराची ...

davbindu October 22, 2011 6:18 AM  

ओंकार ,दहा वर्ष बाहेर राहूनही मन घराभोवती पिंगा घालत ह्यातच सर्व आल...बाकी आपल्या घरी एक वेगळाच फील (रिलैक्स/सुरक्षित कवच काहीही म्हण ) मिळत असतो हे मात्र नक्की ...प्रतिक्रियेबद्दल आभार ...


सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ....!!!

Kanchan Karai October 22, 2011 1:14 PM  

मला माझ्या माहेरच्या घराची अगदी अशीच ओढ आहे. आता ते घर तुटणार आहे, तर आतून खूप वाईट वाटतंय. सगळ्या लहानपणीच्या आठवणी त्याच घराशी निगडीत. निर्जिव भिंतींबद्दल सुद्धा प्रेम वाटतंच माणसाला. देवेंद्र, तुझा लेख एकदम वेगळा आणि आपला आहे.

Nisha October 24, 2011 5:08 PM  

मला वाटायचं माझ्या घराच्याच दारं, खिडक्या, भिंती बोलतात. तुम्हा सर्वांचाच हा अनुभव आहे असं दिसतय.लेख छान लिहिलाय. असा संवाद साधायचा प्रयत्न आजवर ज्यांनी केला नसेल त्यांनाही करावासा वाटेल. अभिनंदन.दीपावलीच्या अनेक शुभेच्छा.

विनायक पंडित October 24, 2011 8:21 PM  

मस्त झालंय ललित देवेन! खूपच छान! तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा त्या सगळ्यांचं म्हणणं कान देऊन कधी ऐकायला लागलो कळलं नाही! शेवट तर अप्रतिमच! एक संपूर्ण लेख! शुभेच्छा!

भानस October 26, 2011 4:43 PM  

देवेन, अगदी मनातले लिहीलेस बघ. भिंतींनी जे वर्षोनवर्षे ऐकलेले असते तेच त्या बोलतात बघ.

आयडियाची कल्पना एकदम झकास!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

davbindu October 31, 2011 10:50 AM  

कांचन ताई ,लहानपणीच्या आठवणींशी जुळलेल घर तुटणार त्यामुळे तुला सध्या काय वाटत असेल हे समजू शकतो .....प्रतिक्रियेबद्दल आभार ग ...

निशाजी ,वा तुमच्याही दार ,खिडक्या ,भिंती बोलतात हे वाचून आनंद झाला ...प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार ....

davbindu October 31, 2011 10:55 AM  

विनायकजी ,मी पण हे सगळे (दरवाजे, भिंती,खिडक्या वैगेरे ) सांगत असतांना असाच लिहित गेलो होतो .... :) प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार ...

श्री ताई , एका वेगळ्या चष्म्यातून घराकडे पाहिल्यावर त्यानेच ही आयडियाची कल्पना सांगीतली ... प्रतिक्रियेबद्दल आभार ग ...

mau October 31, 2011 1:15 PM  

देवेंद्र,खुप छान लिहिले आहेस रे..नोकरीपायी घरं बदलुन कंटाळुन गेलेले मी...आता मात्र स्वतःच्या घरात रहात्ये तो आनंदच वेगळा..जे बघतात तेच घराच्या भिंती बोलतात...मस्तच रे तुझी ही कल्पना...खुप्प आवडला...

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP